विक्की ठाकूरच्या मित्रांची पोलीस कोठडी एका दिवसासाठी वाढली

नांदेड(प्रतिनिधी)- विक्की ठाकूरचा खून झाला त्या दिवशी त्याच्या मित्रांनी सुध्दा गोळीबार केला होता. त्यात अटक करण्यात आलेल्या विक्की ठाकूरच्या तीन मित्रांची पोलीस कोठडी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी एक दिवसासाठी वाढविली आहे.
विक्की ठाकूरचे मारेकरी पकडल्यानंतर मयुरेश सुरेश कत्ते याच्या डाव्या हाताला गोळी लागलेली होती. ती गोळी त्याच्या हातातून आरपार गेली होती. याबाबत मुयरेश कत्तेने दिलेल्या तक्रारीनुसार त्या दिवशी अर्थात 20 जुलै रोजी नितीन बिघानीया सोबत मी आलो होतो. विक्की ठाकूरला बिघानीया कुटूंबातील महिलांशी शिवीगाळ केल्याबद्दल जाब विचारायचा होता. त्यावेळी निखिल उर्फ कालू प्रकाश मदनेने माझ्यावर गोळी झाडली ती माझ्या डाव्या हाताच्या तळव्यातून आरपार निघून गेली. याबाबत गुन्हा क्रमांक 182/2021 दाखल करण्यात आला होता. त्यात निखिल उर्फ कालू प्रकाश मदने, सुरज भगवान खिराडे आणि ईश्र्वरसिंघ जसवंतसिंघ गिरनीवाले या तिघांना अटक झाली होती.
या तिघांना न्यायालयाने एकदा पोलीस कोठडी वाढवून दिली आज ती संपल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्त्येपोड यांनी तिघांना न्यायालयात हजर केले. मयुरेश कत्तेच्या तक्रारीनुसार गोळी मारली होती पण आजपर्यंत या तिघांकडून कोणतीही बंदुक जप्त झालेली नाही. खंजीर जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयाने सरकारी वकील ऍड. मोहम्मद रजियोद्दीन यांची सुनावणी ऐकल्यानंतर या तिघांना एक दिवस अर्थात 3 ऑगस्ट 2021 पर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *