स्वातंत्र्य दिनी  महिला आपल्या दोन निरागस बालकांसोबत उपोषणाला बसली 

नांदेड,(प्रतिनिधी)- आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापनदिन समारोह साजरा झाल्यानंतर एक महिला आपल्या दोन मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसली आहे.आता सुट्टी आणि उद्या पारसी नववर्षाची सुट्टी कसे होईल त्या महिला आणि लेकरांचे.
                  आज स्वातंत्र्य दिनाचा वर्धापनदिन साजरा झाल्यानंतर राहटी ता.नायगाव येथील एक महिला मीरा मारोती कौशल्ये आपली एक मुलगी आणि एक मुलगा अश्या दोघांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण  उपोषणास बसली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात त्यांच्या सासरची मंडळी त्रास देत आहे.त्यांच्या पतीने १५ जानेवारी २००६ जन्मतारीख असलेल्या बालिकेसोबत लग्न केले आहे. असा आरोप त्या निवेदनात करण्यात आला आहे. २१ सप्टेंबर २०२० पासून मीरा आपल्या अधिकारासाठी लढा देत आहेत. ९ मार्च २०२१ रोजी पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कंधार पोलिस ठाण्यास कार्यवाही करण्यासाठी पत्र दिले आहे. तरीही काही एक कार्यवाही करण्यात आली नाही.
                          उपोषणाच्या संदर्भाने वजिराबाद पोलिसांनी मीरा कौशल्ये सोबत संवाद साधला. त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हाधिकारी भेटल्या शिवाय मी काहीच निर्णय घेणार नाही असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. आज तर सुट्टीच आहे. उद्या पारसी नववर्ष सुट्टी आहे.म्हणजे मीरा यांची भेट जिल्हाधिकाऱ्यासोबत मंगळवारीच होऊ शकते.अश्या परिस्थितीत काय होणार आता दोन निरागस बालकांचे आणि त्या महिलेचे हा प्रश्न शोध विषय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *