नांदेड(प्रतिनिधी)-12 नोव्हेंबर रोजी त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात धरणे आंदोलन आयोजित करणाऱ्या तीन आयोजकांना इतवारा पोलीसांनी आज गजाआड केले आहे. 12 नोव्हेंबरच्या घटनेत अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार जखमी झाले.
12 नोव्हेंबर रोजी देगलूर नाका येथील एका चौकात रजाअकादमी या संस्थेच्यावतीने त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. धरणे आंदोलन संपल्यानंतर त्या जमावाने हिंसकता दाखवत दगडफेक आणि जाळपोळ केली. अनेक पोलीस अधिकारी या दगडफेकीत जखमी झाले. तेंव्हा इतवाराचे पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कांही नावांसह असंख्य अनोळखी लोकांविरुध्द गुन्हा क्रमांक 284/2021 दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 307, 353, 326, 427, 333, 337, 143, 147, 148, 149, जोडण्यात आली होती. त्या दिवशीच्या प्रकरणातील अटक झालेले अनेक जण अद्याप तुरूंगात आहेत.
आज इतवाराचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार 12 नोव्हेंबरच्या कार्यक्रमातील तीन आयोजक अमुक ठिकाणी आहेत. त्यानुसार साहेबराव नरवाडे, पोलीस उपनिरिक्षक शेख असद, पोलीस अंमलदार गायकवाड, शेख खाजा आणि मोकले यांनी ते ठिकाणी गाठले. त्या ठिकाणी इम्रान खान युसूफ खान पठाण, शेख जुबेर शेख सादीक आणि रिजवान खान मुसा खान हे सापडले आहेत. या तिघांचा रजाअकादमी या संस्थेत सदस्य असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील कार्यवाही उद्या न्यायालयात होणार आहे.
12 नोव्हेंबरच्या घटनेतील आयोजकांना पकडणाऱ्या इतवारा पोलीसांचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.