नांदेड(प्रतिनिधी)-सन 2014 मध्ये आपल्यासोबत चोरी करण्यासाठी चल असे सांगून तो आला नाही म्हणून त्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला करणाऱ्याना एका आरोपीला तब्बल सात वर्षांनी वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने गजाआड केले आहे.
3 डिसेंबर 2014 रोजी नगीनाघाट जवळील आकाश भगवान पवार यास तिन जणांनी चोरी करण्यासाठी सोबत चल म्हणाले. पण त्याने जाण्यास नकार दिल्यानंतर त्या गुन्हेगारांनी आकाश पवारवर तलवारीच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. त्याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात 189/2014 भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 34 नुसार दाखल झाला. हा गुन्हा करणाऱ्यांमध्ये मनोज उर्फ मन्या शंकरराव पतंगे (35) रा.जुना मोंढा नवीन पुल हा फरार झाला होता.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार मनोज उर्फ मन्या शंकरराव पतंगे(35) हा गुन्हेगार त्याच्या घरी असल्याची माहिती आली. तेंव्हा सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार विजयकुमार नंदे, गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, व्यंकट गंगुलवार, संतोष बेल्लुरोड, शेख इमरान शेख एजाज या पथकाने त्याला पकडून न्यायालयासमक्ष हजर केले. न्यायालयाने 7 वर्ष जुन्या गुन्ह्यातील या आरोपीला न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात पाठविले आहे.
सात वर्षापासून फरार आरोपी वजिराबाद पोलीसांनी पकडला