नांदेड (प्रतिनिधी)- 15 जुलै रोजी बी.के. हॉलजवळ एका हॉटेल चालकासमोर तलवार काढून दशहत निर्माण केल्याप्रकरणी झालेल्या प्रकारानंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्या गुन्ह्यातील एका गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. मुळात हा प्रकार घडला तेव्हा दामिनी पथकाच्या हस्तक्षेपाने हे तीन आरोपी पळून गेले होते.
दि. 15 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बी.के. हॉल समोरील फे्रन्डस् कट्टा या हॉटेलमध्ये मॅगी, चहा आणि पाण्याची बॉटल घेऊन अनिकेत सुर्यवंशी, वीरसिंघ सरदार आणि राहूल पाटील यांनी हॉटेल मालकाने पैसे मागितले तेव्हा पैसे घेतोस काय असे सांगून तलवारीने त्याच्या टेबलावर वार केला. सोबत तलवार फिरवून आम्हालाच पाचशे रूपये अशी खंडणी मागितली आणि त्याठिकाणी दहशत निर्माण केली.
याचवेळेस दामिनी पथकातील गस्ती वाहनमध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रियंका अघाव आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदार अत्यंत जलदगतीने खाली उतरले आणि गुन्हेगारांना थांबण्यास सांगितले. पण दामिनी पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाहून हे तिघे पळून गेले होते. याबद्दल भाग्यनगर पोलीस ठाण्यात फे्रन्डस् कट्टा हॉटेलच्या मालकाने तक्रार दिल्यानंतर गुन्हा क्र. 242/2022 भारतीय दंड संहितेचे कलम 386, 504, 506, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकाला या प्रकरणातील एक आरोपी लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरळक फाटा येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहीम, दिलीप राठोड, रवीशंकर बामणे, देवसिंग सिंगल, शेख अजहर आणि दत्ता वडजे यांनी मरळक फाटा येथून राहूल साहेबराव कदम उर्फ पाटील यास पकडून आणले आणि भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपरपोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.