नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने आजचा सुर्योदय होण्याअगोदर सकाळी 3 वाजताच नांदेड शहरातील जुनागंज भागातून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांची तब्बल 15 तास चौकशी झाली. त्यांनतर सायंकाळी 5 वाजता त्यांना घरी जाण्याची मुभा मिळाली. दरम्यान एनआयएने त्यांचे मोबाईल मात्र आपल्या ताब्यात घेतले आहेत.
देशाची सुरक्षा ही सर्वोच्च आहे. त्या सुरक्षेला अबादीत ठेवण्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणा कार्य करतात. त्यात एनआयएला सर्वात महत्वपूर्ण स्थान आहे. देशात अंतर्गत भागातील लपलेल्या शत्रुंना आपल्या नजरेखाली ठेवणे याचे काम एनआयए करते. राज्यभरात आणि देशभरात एनआयएने अशा अनेक छुप्या लोकांना शोधून काढलेले आहे आणि त्यामुळेच देशाची सर्वोभोमता टिकलेली आहे. आजचा सुर्योदय होण्याअगोदर जुन्या नांदेड भागात मोठे नाट्य घडले. त्यात जुना गंज भागातील चार जणांना एनआयएने आपल्या ताब्यात घेतले. त्या सर्वांना वजिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रांगणात असलेल्या एटीएस कार्यालयात आणले आणि त्यांची सकाळी 3 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे 15 तास चौकशी झाली. त्यांच्याकडील व्हॉटसऍप चॅटच्या तपासणीत बरेच संशयास्पद शब्द आणि हालचाली दिसल्यामुळे एनआयएने त्यांना ताब्यात घेतले होते. या चौकशी दरम्यान पोलीसांना त्यांच्या घरातून काही आक्षेप घेण्यासारखी कागदपत्रेपण सापडली आहेत असे सांगण्यात आले. तब्बल 15 तास चौकशी झाल्यानंतर सध्या तरी या चौघांना एनआयए ने सायंकाळी 5 वाजता मुक्त केले आहे. चाललेली चौकशी आणि त्यांचे गांभीर्य राखत एनआयएने प्रसार माध्यमांना याबद्दल एक शब्द सुध्दा सांगितला नाही. आपल्या शहरात घडलेल्या या चौकशीने नांदेडकरांमध्ये चर्चेचे वेगवेगळे उधाण आले आहेत.