नांदेड (प्रतिनिधी)- सध्याच्या जगात ईनामदारी संपली आहे, असे वक्तव्य नेहमी होत असते, पण ईनामदारी हा संपणारा विषय नाही, तो कधीही संपणारच नाही अशाच आशयाचा एक प्रकार काल घडला.ज्यामध्ये दोन महिलांनी ऑटोमध्ये विसरलेले 1 लाख 92 हजार 500 रूपयांची संपत्ती ऑटोचालक आणि पोलिसांनी संयुक्तरित्या मालकीण महिलांना परत दिली.
काल दि. 1 ऑगस्ट रोजी सौ.सुचिता ज्ञानेश्वर पाटील रा. वसंतनगर नांदेड आणि सौ. निर्मला प्रतापराव पाटील रा. वसंतनगर या दोन महिला ऑटोमध्ये प्रवास करताना कलामंदिराजवळ उतरल्या. त्या ऑटोमध्ये त्यांनी आपली एक बॅग विसरली होती. या बॅगमध्ये भरपूर मोठा ऐवज होता. बॅगमध्ये 80 हजार रूपये किंमतीचा आयफोन, 2 तोळे सोन्याचे गंठण 1 लाख रूपये किंमतीचे असा 1 लाख 92 हजार रूपयांचा ऐवज होता. हा ऐवज विसरलेल्या ऑटोचा क्र. एम.एच. 26 एन. 4753 असा होता. या ऑटोचे चालक भाऊसाहेब संभाजी कांबळे वय 47 रा. विष्णूनगर हे होते. घडलेला प्रकार महिलांनी पोलिसांना सांगितला. वजिराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी या कामासाठी पोलीस अंमलदार डी.एस. केंद्रे आणि एस.जी. वाळेकर यांची नियुक्ती केली. पोलिसांनी त्वरीत प्रभावाने ऑटोचालक शोधला, त्यांचा नंबर उपलब्ध केला आाणि त्यांना कॉल केला तेव्हा ऑटोचालकाने सांगितलेले शब्द महत्वपूर्ण आहेत. ते असे की, साहेब मला बॅग मिळाली तेव्हापासून मलाच घाम येत आहे. मी स्वत: या बॅगच्या मालकीण बाईंना शोधत आहे आणि मला त्यांना हा ऐवज परत करायचा आहे. तेव्हा पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे सदस्य भाऊसाहेब संभाजी कांबळे, त्यांचे सहकारी धम्मपाल प्रकाश थोरात, शेख ईस्माईल शेख मंजुर, दीपक गंगाराव वगळे यांच्या समक्ष 1 लाख 92 हजार 500 रूपयांचा ऐवज मालकीण महिलांना परत करण्यात आला. हा घटनाक्रम विचारात घेतला तर सध्यातरी असे म्हणता येणार नाही की, ईमानदारी ही जगातून अद्याप संपलेली नाही.