५ ऑगस्ट हत्तीरोग नियंत्रण दिन

 

५ ऑगस्ट हा ” हत्तीरोग नियंत्रण दिन ” म्हणून पाळण्यात येतो. महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. हत्तीरोग (लिम्फॅटिर फायलेरियासिस) हा डासा पासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय नि वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणे ही अवघड होवून बसते. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो. हत्तीरोग हा ‘क्युलेक्स विचकि फॅसिएटस’ नावाचा अळ्या ज्यांना मायक्रोफिलेरिई असे म्हणतात त्या अळ्यांमुळे होतो. या अळ्या डासांच्या चाव्याद्वारे पसरतात. निरोगी व्यक्तीस डास चावल्यामुळे संक्रमण होते. हा रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. हत्तीरोग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधांचे एकदाच सेवन करणे आवश्‍यक आहे. १९५५ पासून भारत देशात राष्ट्रीय स्तरांवर हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालये, शासकीय संस्था वगैरेंमधून राबविण्यात येतो. भारतात हा रोग प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तमिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश , असाम, कर्नाटक इत्यादी राज्यात आढळतो.

 

माणसांमध्‍ये लसिकाग्रंथिंच्‍या हत्‍तीरोगाचा प्रादुर्भाव गत ४००० वर्षापासून होत असावा,असे दिसून येते. १८६६ मध्‍ये लेविस, डिमार्क्यू आणि विचेरिया यांनी मायक्रोफायलेरिया व हत्‍तीरोगाचा परस्‍पर संबध असल्‍याचे स्पष्ट केले. १८७६ मध्‍ये जोसेफ बॅनक्रॉप्‍टी यांनी हत्‍तीरोगाचा पूर्ण वाढ झालेला जंतू शोधला. हत्तीरोग जंतूच्या जीवन चक्रासंदर्भात पॅटेट्रीक मॅन्‍सन आणि जॉर्ज कॉर्मिसेल यांचे संशोधन ही मोलाचे आहे. हत्‍तीरोगाचा प्रसार सुतासारखा दिसणाऱ्या परोपजीवी कृमींमुळे होतो. भारतामध्‍ये ९८ टकके रुग्‍णांमध्‍ये हत्‍तीरोगाचा प्रसार बुचेरिया बॅनक्रॉप्‍टी या परोपजीवी कृमींमुळे झालेला आढळून येतो. भारतातील २५० जिल्‍हयांमध्‍ये स्‍थानिक स्‍वरुपात लागण झालेल्‍या हत्‍तीरोग रुग्‍णांची नोंद आहे. प्रौढ अवस्‍थेमध्‍ये हत्‍तीरोगाचे जंतू लसीका संस्‍थेच्‍या वाहिन्‍यांमध्‍ये राहतात. लसीका संस्‍था ही लसीका ग्रंथी आणि लसीका वाहिन्‍यांची बनलेली यंत्रणा असून ती शरीरातील रोगप्रतिकार शक्‍ती अबाधित ठेवण्याचे कार्य करते.

लक्षणे :हत्तीपाय रोगाची तशी किरकोळ लक्षणे दिसून येताता. थंडी वाजून येणे, ताप येणे. पाय दुखून येणे. वृषन आकराने जाड होणे. मनुष्याचे दोन्ही पाय, हत्तीच्या पायांसारखे जाड व मोठे होतात आणि हालचाल करण्यास अवघड होणे, इत्यादी लक्षणे सांगता येतात.

 

रोगकारक घटक :मनुष्‍या मध्‍ये फार पुर्वी पासून हत्‍ती रोगाचे जंतू आढळून येतात. सर्व वयोगटांमध्‍ये हत्‍तीरोगाची लागण होऊ शकते. तसेच स्‍त्री किंवा पुरुष दोघांना हत्‍तीरोग होऊ शकतो. मात्र हत्‍तीरोगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या क्षेत्रात पुरुषां मध्‍ये हत्‍तीरोगाचे प्रमाण जास्‍त दिसून येते. वारंवार स्‍थलांतर करणाऱ्या लोकांमुळे एका भागातून दुसऱ्या भागात हत्‍तीरोगाचा प्रसार होतो.

रोगनिदान व उपचार :थंडी ताप किंवा इतर लक्षणे दिसून आल्याबरोबर, रक्त तपासणी करून हत्तीरोग चाचणी करून घ्यावी. रक्त तपासणीत हत्तीरोग दूषित रुग्ण आढळल्यास त्याला सहा दिवस उपचारानंतर एक दिवसाचा गॅप देऊन बारा दिवस डी.ई.सी. गोळ्या देतात. या गोळ्यांच्या सेवनाने रिॲक्शन येऊ शकते. उपचार कालावधी हा जास्त असल्यामुळे हत्तीरोग रुग्णाने डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानेच संपूर्ण उपचार घेणे आवश्यक आहे. तेव्हाच या रोगांचे नियंत्रण होऊ शकते.

प्रतिबंधात्मक उपाय:संपूर्ण समुदायाला सूक्ष्म अळ्या मरतील अशी औषधे देणे, आणि डासांचे नियंत्रण करणे या गोष्टींचा समावेश आहे. डासांचे चावे टाळणे हा प्रतिबंधाचा आणखी एक प्रकार आहे. हत्तीरोगाचे जंतू पसरवणारे डास हे सामान्यतः संध्याकाळी आणि पहाटे चावतात. हत्तीरोगाचे प्राबल्य असलेल्या भागात आपण राहात असाल तर पुढील खबरदारी घ्या. मच्छरदाणी किंवा कीटनाशक मारलेल्या मच्छरदाणीचा उपयोग करावा. संध्याकाळ ते पहाटेच्या दरम्यान उघड्या त्वचेवर डास निवारक लावावे.

महेंद्र दि.वाघमारे,आरोग्य कर्मचारी, जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *