गावपातळीवर ग्रामसेवक पोहोचेल दिव्यांगापर्यंत- मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल

नांदेड (प्रतिनिधी)-लाभार्थ्याच्या सकारात्मक सहभाग योजनेत असेल तर ती योजना खऱ्या अर्थाने सफल होते. दिव्यांगांच्या विकासाकरीता आम्ही ग्रामपंचात पातळीपर्यंत नियोजन केले आहे. ग्रामसेवक हा आपआपल्या गावात दिव्यांग व्यक्तीपर्यंत जाईल. त्याच्याशी हितगुज साधेल. सर्वेक्षणाचा अर्ज भरण्यासाठी मदत करेल. तथापि हे सर्वेक्षण अधिक काटेकोर होण्यासाठी दिव्यांगांचाही सहभाग यात असणे गरजेचे होते. यामुळेच आम्ही दिव्यांगांच्या विविध संघटनांनाही यात सहभागी करून घेतले आहे. हे सर्वेक्षण लवकरच जिल्हा पातळीवर “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” 8 सप्टेंबर पर्यंत पूर्ण केले जाईल. या सर्वेक्षणातील जे निष्कर्ष निघतील त्याला प्राधान्य देऊन ग्रामपंचायत पातळीवरील विविध योजनांसाठी निधीचा प्राधान्यक्रम निश्चित करता येईल. दिव्यांगांच्या अधिक सोईच्या दृष्टीने शासकिय योजना पोहोचविण्यासाठी लवकरच जिल्हा पातळीवरील “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” हा अभिनव उपक्रम घेत आहोत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितले.

दिव्यांगांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर सर्वेक्षणास प्रारंभजिल्हाधिकारी अभिजीत राऊत

दिव्यांग व्यक्तींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात दिव्यांगाच्या विविध संघटनांना सोबत घेऊन ग्रामपंचायत पातळीपर्यंत परिपूर्ण सर्वेक्षणासाठी नियोजन केले आहे. जिल्ह्यातील कोणताही दिव्यांग व्यक्ती सर्वेक्षणापासून वंचित राहू नये यादृष्टिने ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद आणि नांदेड महानगरासाठी महानगरपालिका येथे सर्वेक्षणाचे अर्ज व मार्गदर्शक त्या-त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत.

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींपर्यंत त्यांना आवश्यक असणाऱ्या योजना नेमकेपणाने पोहोचाव्यात, योजनांच्या निकषांची पूर्तता होण्यासाठी जी कागदपत्रे, प्रमाणपत्रे आवश्यक असतात ती प्रमाणपत्रे त्यांना उपलब्ध करून देता यावीत यादृष्टिने सर्वेक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. ही सद्यस्थिती समजण्यासाठी सर्वेक्षण अर्ज व त्यातील प्रश्नावली सहज व सुलभ तयार करण्यात आली आहे. एकाच पानावर असलेली माहिती दिव्यांग व्यक्तींना भरावयाची आहे. जे दिव्यांग बांधव संगणकिय व इंटरनेटशी जुळलेले आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. हे अर्ज https://forms.gle/gBi9aAW21yu5MzPy5 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची व्याप्ती व विस्तार लक्षात घेता दिव्यांगांच्या योजनांसाठी, दिव्यांगांना शासनाशी सहज व सुलभ संपर्क साधता यावा यादृष्टिने तालुकापातळीवरील सर्व कार्यालयांपर्यंत योग्य ते निर्देश दिलेले आहेत. अनेक दिव्यांगांना आधार कार्डावरील त्रुटीपासून ते विविध प्रमाणपत्रांच्या पूर्ततेबाबत काही अडचणी येतात. यामुळे त्यांना इतर योजनांसाठी अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व त्रुटी दूर व्हाव्यात व त्यांच्या हक्कांच्या योजना नेमकेपणाने त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात हे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी अचूक सर्वेक्षण होण्याबाबत आमचा भर राहील, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *