शिराढोण (प्रतिनिधी)-येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिमवंत केदार वैराग्य पिठाधीश्वर श्री. श्री. श्री. १००८ जगदुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी (शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र. प्र. षडक्षर शिवाचार्य महाराज शिराढोणकर) यांच्या सान्निध्यात १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवात व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी आश्विन शुद्ध ९ या दिवशी रात्री ७ ते १० पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम व रात्री १० ते १ वाजेपर्यंत गावातील विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. रात्री ३ वाजता ब्रहामी मुहूर्त भीमाशंकर महाराजांच्या पालखीचे अग्निकुंडातून प्रवेश होईल. त्यानंतर यात्रेला प्रारंभ होत असतो.
शिराढोण येथे अनेक वर्षापासून नवरात्र उत्सव व भीमाशंकर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते. या यात्रेत महाराष्ट्रासह अन्य राज्यातून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित • राहून दर्शन घेतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या हर्षउल्लासात ही यात्रा भरविण्यात येत आहे. या यात्रेला खूप दूरवरून यात्रेकरूंची गर्दी होत असते. विविध राज्यातून भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतात. दरम्यान भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव निमित्त दररोज शिवपाठ, दुर्गा सप्तसती, पारायण, रेणुकविजय पुराण, अखंड, भगवन्नाम सप्ताह, रात्री ८ ते ११ शिवकिर्तन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवात १५ ऑक्टोबरपासून दररोज संध्याकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १५ ऑक्टोबर रोजी शि.भ.प. शिवानंद हांडरगुळे दापशेडकर, १६ ऑक्टोबर रोजी शि.भ.प. बालाजी भोस्कर गुरुजी बेंद्रीकर, १७ ऑक्टोबर रोजी शि.भ.प. विकास महाराज दसवाडीकर, १८ ऑक्टोबर रोजी शि.भ.प. अमोल महाराज लांडगे गुरुजी, १९ ऑक्टोबर रोजी शि.भ.प. बालाजी स्वामी पार्डी (लोहा), २० ऑक्टोबर रोजी शि.भ.प. स्वातीताई माधव तमसशेट्टे, २१ ऑक्टोबर रोजी मन्मथअप्पा डांगे गुरूजी, २२ ऑक्टोबर रोजी किशोरीताई तागबिडकर तर २३ ऑक्टोबर रोजी विश्वनाथ स्वामी पेनुरकर यांचे प्रसादावरील कीर्तन होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी विजयादशमी दिवशी सकाळी ११ वाजता पालखीचे विसर्जन व जगदुरूंचे आशीर्वचन होईल. तरी पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवात होणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन जगदुरूंचे आशीर्वाचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.