अर्धापूर (प्रतिनिधी)- सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव तथा अर्धापूर तालुक्यातील कामठा (बु.) चे रहिवासी उपसरपंच रणजितसिंघ खंड्डासिंघ कामठेकर (वय 60) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना सोमवार दि.13 नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
दि.11 नोव्हेंबर शनिवारी रोजी सायंकाळी कामठा बु येथील घरी असतांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तात्काळ नांदेड येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
त्यावेळेस डॉक्टरांनी 72 तास निगरानीखाली ठेवण्याचे होते.रविवारी कामठेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सचखंड गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी, मित जत्थेदार ज्योतिंदरसिंघ बाबाजी, खा . हेमंत पाटील ,आ.मोहनअण्णा हंबर्डे,आ. बालाजी कल्याणकर यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यंवर, शिख समाजातील बांधव आदींनी दवाखान्यामध्ये भेट दिली होती. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. या दरम्यान रणजितसिंघ कामठेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याकरीता संबंधित सर्व लोकांनी आणि समाज बांधवांनी प्रार्थंना करावी, असे आवाहन कामठेकर परिवाराने केले होते.

दरम्यान सोमवारी दि.13 रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देखील दवाखान्यात जावून कामठेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. वेळ पडल्यास कामठेकर यांना एअर ऍम्बुलन्सने तात्काळ मुंबईला हलविण्याची तयारी देखील सुरु करण्यात आली होती. परंतु दुर्देवाने सोमवारी दि,१३ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांना हृदयविकाराचे दोन झटके आले. त्यातच त्यांचे निधन झाले. ही वार्ता कळल्यावर नांदेडातील व कामठा व परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने दवाखान्याकडे धाव घेतली.
त्यांच्या निधनाने कामठा आणि परिसरात तसेच खालसा कॉलनीमध्ये शोककळा पसरली आहे. रणजितसिंघ कामठेकर हे संचखड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव,कामठा येथील बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,त्याचबरोबर जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस ,जवळपास चाळीस वर्षा ते सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर होते.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नांदेड खालसा कॉलनीत ठेवण्यात येणार असून अंत्ययात्रा मंगळवार दि.14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता निघून सकाळी 10 वाजता नगिनाघाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, एक बहिण,
, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने कामठा बु आणि अर्धापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.