
नांदेड,(प्रतिनिधी)- साडे दहा वर्षांपूर्वी बोळसा ता.उमरी वीज वितरण कंपनीच्या तंत्रज्ञाना मारहाण करणाऱ्या दोघांना भोकर येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश वाय.एम.एच. खरादी यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी २००० हजार रोख दंड ठोठावला आहे.
दिनांक ४ फेब्रुवारी २०१२ रोजी बोळसा ता.उमरी येथे देवीची यात्रा होती.त्या संदर्भाने वीज वितरण कंपनीचे तंत्रज्ञ पांडुरंग दत्तराम मोरे आणि त्यांचे सहकारी बोळसा ता.उमरी येथे वीज पुरवठा सुरळीत राहावा हे पाहण्यासाठी गेले होते.तेथे त्यांना एका डीपी मध्ये फ्युज नाहीत असे दिसले.तेव्हा ते डीपीमध्ये फ्युज लावत असतांना तेथे राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे हे दोघे आले.त्यांनी तंत्रज्ञ पांडुरंग दत्तराम मोरे (३०) यांना तुंमच्या मुळेच लाईट गेली असे सांगत लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच सरकारी कामात अरथळा निर्माण केल्याची तक्रार मोरे यांनी पोलीस ठाणे धर्माबाद येथे दिली. त्यावरून गुन्हा क्रमांक ६/२०१२ दाखल झाला. पुढे राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे या दोघांविरुद्ध जिल्हा न्यायालय भोकर येथे दोषरोपपत्र सादर करण्यात आले.
न्यायालयात या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुरावा आधारे न्या.खरादी यांनी राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे या दोघांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ आणि ३४ साठी एक वर्ष साधी कैद आणि एक प्रत्येकी हजार रुपये रोख दंड तसेच कलम ३३२ आणि ३४ नुसार सहा महिने साधी कैद आणि प्रत्येकी एक हजार रुपये रोख अशी शिक्षा ठोठावली आहे. दोन्ही शिक्षा त्यांना एकत्रित भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील ऍड.रणजित देशमुख यांनी मांडली.
