नांदेड(प्रतिनिधी)-विकासाचा मुद्या समोर ठेवून देगलूर, बिलोली विधानसभा पोटनिवडणुक वंचित बहुजन आघाडी स्वत:च्या ताकतीवर लढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी सांगितले.
आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रेखाताई ठाकूर बोलत होत्या. देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे आ.रावसाहेब अंतरापूरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आता पोट निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. वंचित बहुजन आघाडी सुरूवातीपासूनच निवडणुक जिंकण्याची तयारी करत आहे. वंचित बहुजन आघाडी हा विरोधा मजबुत पर्याय आहे. प्रस्तावित सत्ताधाऱ्यांना जागा दाखविण्यासाठी देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाची निवडणुक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीच्या समोर मोठा निधी या मतदार संघासाठी दिला असे दाखवून आम्ही काम करत आहोत हे दाखविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यावर जनतेला सत्य सांगणे, त्यांचे प्रश्न जोरदारपणे उपस्थित करणे, या मतदार संघात ऍट्रॉसिटी प्रकरांबद्दल जागृकता निर्माण करून त्या कशा रोखता येतील यावर या निवडणुकीत आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना या निवडणुकीत स्थान मिळेल असे रेखाताई ठाकूर यांनी सांगितले. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला विजयाची खात्री असल्याचेही रेखाताई ठाकूर म्हणाल्या.
या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, विभागीय सदस्य डॉ.संघरत्न कुऱ्हे, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, इंजि.प्रशांत इंगोले, महिला जिल्हाध्यक्षा दैवशाला पांचाळ, नामदेव येईलवाड, महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, आयुब खान पठाण, महासचिव शाम कांबळे, साहेबराव बेळे यांचीही उपस्थिती होती.
वंचित बहुजन आघाडी स्वबळावर देगलूर, बिलोली विधानसभा लढविणार-रेखाताई ठाकूर