नायगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील सांगवी येथील कै. नारायनराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी. शालेय स्तरावर नियमबाह्य पोषण आहार समिती गठीत करुन शासनाची फसवणूक केली आहे. सदर प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. पण कारवाई करण्यास गटशिक्षणाधिकारी मागच्या सहा महिण्यापासून टाळाटाळ करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
आनंदीबाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भगवान पवार होटाळकर यांनी नायगाव तालुक्यातील कै. नारायनराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी पोषण आहार समितीची नियमबाह्य गठण करुन
त्याद्वारे विविध ठराव घेवून शासनाची फसवणूक केली आहे असा आरोप करुन सदर प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. तक्रारी नंतर चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत कै. नारायनराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी शासन निर्णयानुसार शालेय व्यवस्थापन समितीचे गठण न करता गैरकायदशीर व नियमबाह्य शालेय पोषण आहार समिती गठीत करुन शासनाची फसवणूक केली आहे.

या समीतीने नियमबाह्य ठराव घेवून शालेय पोषण आहार समितीचे नायगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते उघडले. तसेच स्वयंपाकी व मदतनीस म्हणून श्री हंबर्डे यांची चुकीच्या पद्धतीने नेमणूक करुन गटशिक्षणाधिकारी कार्यालयास माहिती दिल्यामुळे शासनाचे मानधन त्यांना प्रदान झाले आहे ही एक प्रकारची फसवणूकच शासनाची आहे. याबाबत शासनाचे कोणतेही परिपत्र अथवा पत्र नसतांना नियमबाह्यरित्या शालेय पोषण आहार समितीचे गठण व त्याद्वारे विविध ठराव घेवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सदरील गैरकायदशीर समितीच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करावी असेस्पष्ट आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जानेवारी २०२१ मध्ये दिले होते. पण आजपर्यंत सदर प्रकरणी कुठलीही कारवाई न करता नायगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार काय कारवाई करावी याबाबत मला संधिग्दता वाटली होती. त्यामुळे मी शिक्षणाधिकाऱ्याकडून मार्गदर्शन मागवले आहे. पण काय कारवाई करावी याबाबत अद्याप मार्गदर्शन आले नसल्याने कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
-सौ. लता कौठेकर, गटशिक्षणाधिकारी, नायगाव.