शहाजी उमाप यांना नासिक ग्रामीण आणि विजयकुमार मगर यांना नागपूर ग्रामीण
नांदेड(प्रतिनिधी)-31 पोलीस अधिक्षक, 54 अपर पोलीस अधिक्षक, 92 पोलीस उपअधिक्षक आणि 6 सहायक पोलीस अधीक्षक अशा 183 पोलीस अधिकाऱ्यांना राज्य शासनाने बदल्या दिल्या आहेत. पोलीस अधिक्षकांच्या बदलीमध्ये सर्वात महत्वपूर्ण बदली म्हणजे नांदेडमध्ये अपर पोलीस अधिक्षक असलेले शहाजी उमाप यांना नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. या बदल्यांच्या यादीमध्ये नांदेडच्या पोलीस अधिक्षकांचे नाव नाही हे पाहुन अनेकांच्या पोटात पोटशुळ उठला असेल.
राज्य शासनाच्या गृहविभागातील सहसचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार 31 पोलीस अधिक्षकांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यात नांदेड येथील माजी अपर पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांना नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधिक्षक पद देण्यात आले आहे. नांदेड येथील माजी सहाय्यक पोलीस अधिक्षक विनीता साहु यांना राज्य राखीव पोलीस बल गट-5 दौंड पुणे येथे समादेशक पदावर पाठविले आहे. पंकज देशमुख यांना आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळाली आहे. नांदेडचे माजी पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांना नागपूर ग्रामीण जिल्ह्यात पोलीस अधिक्षक पद देण्यात आले आहे अशा प्रकारे 31 पोलीस अधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
नवीन सहा सहायक पोलीस अधीक्षकांना राज्य सरकारने नवीन नियुक्त्या दिल्या आहेत.त्यात लातूर येथे अनुराग जैन यांना पाठवले आहे.उस्मानाबाद येथे नवनीत कुमार कावत यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
यासोबतच अपर पोलीस अधिक्षक दर्जाच्या 54 अधिकाऱ्यांना राज्य शासनाने नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील कोणीही अपर पोलीस अधिक्षक बदलेला नाही. पण माजी अपर पोलीस अधिक्षक ताणाजी संभाजी चिखले यांना रायगड येथे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधिक्षक हे पद देण्यात आले आहे. नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांना प्राचार्य राज्य राखीव पोलीस बल, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड पुणे येथे नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेडमध्ये मागे कांही दिवस पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार सांभाळणारे श्रीकृष्ण कोकाटे यांना पोलीस उपायुक्त मुंबई शहर अशी नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्य सरकारने 92 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये नांदेड येथील बिलोलीचे डॉ.सिध्देश्र्वर धुमाळ यांना सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर अशी नियुक्ती देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथील अर्चना पाटील यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा नांदेड ग्रामीण पोलीस उपविभाग अर्धापूर येथे नियुक्ती मिळाली आहे. नांदेड ग्रामीणचे पोलीस उपअधिक्षक बाळासाहेब देशमुख यांना बृहणमुंबई येथे सहाय्यक आयुक्त पदावर पाठविण्यात आले आहे. कंधार येथील पोलीस उपअधिक्षक किशोर कांबळे यांना वसमत उपविभाग जिल्हा हिंगोली येथे नियुक्ती मिळाली आहे. किनवट येथील पोलीस उपअधिक्षक मंदार नाईक यांना सहायक आयुक्त नवी मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेडमध्ये असलेले माजी उपअधिक्षक विशाल खांबे हे आता अपर पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद परिक्षेत्र येथे जाणार आहेत. नांदेड येथील माजी पोलीस उपअधिक्षक अभिजित फसके यांना बार्शी येथून बदलून आष्टी उपविभाग जि.बीड येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
नांदेड येथून चार पोलीस उपअधिक्षक बदलून जात आहेत. ज्यात नांदेड ग्रामीण, अर्धापूर, किनवट, बिलोली, कंधार अशी चार उपविभागीय पदे रिक्त होत आहेत. बदल्यामध्ये फक्त एकच उपविभागाला नियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे किनवट, कंधार, आणि बिलोली हे तीन पोलीस उप विभाग रिक्तच राहिले आहेत.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची बदली व्हावी आणि कारभार आपल्या हातात यावा असे दुषीत स्वप्न बाळगणारे आणि ज्यांची बदली व्हावी म्हणून आपले देव पाण्यात ठेवणाऱ्या सर्वांची तोंडी आज पुन्हा एकदा खाली पाहण्याची वेळ आली आहेत. स्वप्ने जरूर बाळगावीत पण त्यासाठी आपल्यात ताकत निर्माण करण्याची धमक असावी लागते.उगीचच देव पाण्यात ठेवल्याने स्वप्ने पूर्ण होत नसतात.कोणी सांगावे यासाठी त्यांना.भगवंत आतातरी सद्बुद्धी देईल अश्या लोकांना.काळ परवाच एका बैठीकीत नागरिकांनी चौकशी बाबत समक्ष नकार देताना केलेली तारीफ लक्षात असू द्यावी.