नायगाव (प्रतिनिधी)-कोविड -१९ चा प्रादुर्भाव व मागील वर्षांपासून लागू असलेले लॉकडाऊन यामुळे ग्रामीण जनतेवर मोठा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी, अपंग, विधवा, वृद्ध एकल कुटुंब तसेच रोजंदारीवर जगणारे कुटुंबांना फटका बसला असून अश्या गरजू कुटुंबांना आधार मिळावे यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेने किमान १५ दिवस पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचे किट मांजरमवाडी येथे वाटप करण्यात आले आहे.
संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षपासून सामाजिक उपक्रम राबवित असते. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये अनेक गरजू, गरीब कुटूंबांना अन्नधान्य व इतर मदतीतून आधार देत आली आहे. यावर्षी देगलूर, बिलोली, नायगाव, मुखेड आदी तालुक्यातील गरीब, कष्करी कुटुंबांना किमान १५ दिवस पुरेल एवढे किराणा साहित्य देण्यात येते. संस्थेने मांजरम व मांजरमवाडी गावातील वृद्ध, निराधार अपंग गरजू कुटुंबांना धान्य किट दिले. मांजरमच्या सरपंच सौ. शोभाबाई माली पाटील, उपसरपंच प्रतिनिधी हनुमंत शिंदे ग्रामविकास अधिकारी टी. जी. रातोळीकर यांच्या हस्ते अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
मांजरम व वाडीतील अत्यंत गरजू अश्या ४० कुटुंबांना घरपोच मदत पुरविण्यात आली आहे. सगरोळीच्या संस्थेने सामाजिक भावनेतून केलेल्या मदतीमुळे गरजूंनी संस्थेचे आभार मानले आहेत. संत तुकडोजी महाराज जल व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते जलदूत शिवाजी गायकवड, संस्थेचे व्यवस्थापक गंगाधर कानगुलवार, सचिन बाबळे यांच्या हस्ते गावातील गरजू कुटुंबांना अन्न धान्य वाटपाची प्रक्रिया पार पाडली.
संस्कृती संवर्धन मंडळाकडून मांजरम येथील गरजूना अन्नधान्य किटचे वाटप